पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ बसेसच्या संख्येत येत्या मंगळवारपासून (19 जानेवारी) वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आता दररोज 1 हजार 500 बसेस सोडण्यात येणार आहेत.
पीएमपीची मार्चपासून बंद असणारी प्रवासी सेवा सप्टेंबरपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात सुमारे 500 बसेस सोडण्यात येत होत्या. मात्र, आता दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
येत्या काळात पीएमपीची सेवा पूर्ववत होत असून, येत्या काळात पूर्ण क्षमतेने बसेस सोडण्यात येणार आहेत. सध्या सुमारे 1 हजारांहून अधिक बसेस धावत आहेत. परंतु, अनेक बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात येत नसल्याचे चित्र देखील आहे.
प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सोमवारी सुमारे 1 हजार 400 बसेस सोडल्या होत्या. मंगळवारपासून या संख्येत वाढ करण्यात येणार असून, दररोज 1 हजार 500 गाड्या सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.