सातारा – जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली अतिवृष्टी व महापुराचा फटका 1 लाख 47 हजार शेतकऱ्यांना बसला असून सुमारे 57 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
जिल्ह्यात विशेषत: सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कराड, पाटण या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त असते. यावर्षी सहा महिन्यांत पावसाने हाहाकार माजवल्यामुळे शेतकरीराजा मेटाकुटीस आला. काही महिन्यांमध्ये झालेली अतिवृष्टी व महापुराने शेतकरी उध्वस्त झाला असतानाच पुन्हा जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला. विशेषत: माण, खटाव, फलटण
या दुष्काळी तालुक्यांना त्याचा मोठा फटका बसला. जून- जुलै महिन्यातील प्रचंड पावसामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. दरवर्षीच्या तुलनेत जादा पाऊस झाल्याने ओल्या दुष्काळाची मागणी करण्यात आली होती. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्याच. पण ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांनाही अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. दुष्काळी तालुके वगळता जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यातून बाहेर पडत असतानाच पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दैना उडवून दिली.
खरीपाची हातातोंडाला आलेली पिके या अतिवृष्टीमुळे धोक्यात आली. खरीप हंगामात सुमारे तीन लाख चार हजार 180 हेक्टरवर पेरणी झाली होती. अतिवृष्टीने सुमारे 56 हजार 946 हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. सातारा तालुक्यात चार हजार 888 हेक्टर शेतीचे नुकसान होऊन 17 हजार 940 शेतकरी बाधित, कोरेगाव तालुक्यात तीन हजार 635 हेक्टर शेतीचे नुकसान होऊन तीन हजार 593 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खटाव तालुक्यात दोन हजार 353 हेक्टर क्षेत्राचे नुकसान व 22 हजार 59 शेतकरी बाधित झाले. महाबळेश्वर तालुक्यात एक हजार 353 हेक्टर शेतीचे नुकसान होऊन पाच हजार 69 शेतकऱ्यांना फटका बसला.
वाई तालुक्यात एक हजार 288 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झआले. तीन हजार 477 शेतकऱ्यांना फटका बसला. जावळी तालुक्यात 585 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. चार हजार 842 शेतकरी बाधित झाले आहेत. खंडाळा तालुक्यात चार हजार 623 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्याचा फटका 13 हजार 930 शेतकऱ्यांना बसला आहे.
कराड तालुक्यातील एक हजार 444 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. त्याचा फटका सहा हजार 461 शेतकऱ्यांना बसला. पाटण तालुक्यातील दोन हजार 999 हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन त्याचा फटका 12 हजार 332 शेतकऱ्यांना बसलो. फलटण तालुक्यात 15 हजार 566 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. त्याचा फटका 38 हजार 480 शेतकऱ्यांना बसला. माण तालुक्यातील दहा हजार 428 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून त्याचा फटका 18 हजार 439 शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना बसला आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरानंतर परतीच्या पावसाने उर्वरित शेतीला तडाखा दिला आहे. याबाबत महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्यात आले असून त्यानुसार एक लाख 46 हजार 592 शेतकऱ्यांना फटका बसला असून 57 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानंतर राज्यपालांनी मदतीची घोषणाही केली. मात्र, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असून भरीव मदत देवून उध्वस्त शेतकऱ्याला आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.
हेक्टरी 25 हजार रुपये द्या
अतिवृष्टी, महापूर व त्यानंतर परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करुन हेक्टरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पीककर्ज माफ करावे अशा मागण्या करण्यात आल्या. तसा ठराव शासनास पाठवण्यात आला.
राज्यपालांनी शेतकऱ्यांनी हेक्टरी आठ हजार तर बागायतदारांना 18 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे मत विविध राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. शेतकरी वर्गातूनही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून भरीव मदत देवून शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी होत आहे.