प्रियांका गांधी यांचा मोदी सरकारला सवाल
नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांचे तब्बल 8 लाख कोटी रूपयांचे कर्ज माफ केल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. ही मेहरबानी नेमकी झाली कोणावर? त्यांची नावे सरकार का जाहीर करीत नाही असा सवाल कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. या कर्जमाफी प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी कालच कॉंग्रेसने केली होती त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांनी हा सवाल केला आहे.
काळे धन बागळणाऱ्यांची नावे जाहीर करण्याची हमी देऊन सत्तेवर आलेले सरकार आता ज्या उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात आली आहेत त्यांची नावे जाहीर करण्यास का कचरते आहे असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर केला आहे. कोणत्या प्रक्रिये द्वारे ही कर्जमाफी देण्यात आली असा प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
मात्र भाजप किंवा केंद्र सरकार यांच्यापैकी कोणाकडूनही त्यावर अद्याप प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. आपल्या देशातील शेतकरी कर्जाच्या बोजा खाली दबलेले असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी कोणत्या धोरणाने मोदी सरकारने आपल्या श्रीमंत मित्रांची ही कर्जमाफी केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारला या प्रश्नांची उत्तरे टाळता येणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. भारतात काही उद्योगपतींना देण्यात आलेल्या या कर्जमाफीचा उल्लेख क्रेडीट सुईसे या जागतिक वित्तीय संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे.