राजगुरूनगर – खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 21 गावांतील 2823 शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख 98 हजार रुपयांची नुकसानभरपाई आतापर्यंत वाटप करण्यात आली असून अजूनही 32 हजार 566 शेतकरी नुकसानभरपाई 8 कोटी 13 लाख 760 रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 35 हजार 389 शेतकऱ्यांचे 12 हजार 163 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यात खरीप हंगामात 44 हजार 416.13 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली होती. तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत अवकाळी पाऊस झाला. यावेळी नगदी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खेड तालुक्यात महसुली गावातील महसूल विभागाच्या अधिपत्याखाली नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण होऊनही शासनाकडून बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लटकल्याने शेतकरी वर्गातून नाराजी पसरू लागली आहे.
खेड तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसात खरीपाच्या एकूण 44 हजार 416.13 हेक्टर पेरणीक्षेत्रापैकी 12 हजार 163.72 हेक्टर नुकसान होऊन 35389 बाधित शेतकऱ्यांचा आकडा आहे. त्यापैकी जिरायत खरीप पिकांना हेक्टरी 8 हजार शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 12 हजार 153. 52 हेक्टरसाठी 9 कोटी 72 लाख 28 हजार 160, फळबांगाच्या नुकसानीसाठी हेक्टरी 18 हजार नुकसानभरपाई जाहीर केल्याप्रमाणे 10.20 हेक्टर फळपिकांच्या नुकसानपोटी 1 लाख 83 हजार 600 रुपये असे एकूण 9 कोटी 74 लाख 11 हजार 760 रुपयांपैकी 21 गावांतील 2823 बाधित शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख 98 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
खेड तालुक्यात प्राप्त झालेल्या निधीचे वितरण 21 गावांना केले असून बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित बाधित शेतकऱ्यांच्या गावनिहाय आणि बॅंक शाखेनिहाय विगतवारी करण्याचे काम सुरू असून जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे गावनिहाय निधी वितरीत केला जाणार आहे.
सुचित्रा आमले, तहसीलदार