दोन विभागांची टोलवाटोलवी प्रवाशांच्या जीवावर
श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – श्रीगोंदा-टाकळी रस्त्यावरील घोड कॅनलवरील पुलाचे कठडे ढासळले आहेत. त्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास हा पूल केव्हाही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच या पुलाच्या देखभाल दुरुस्तीवरून दोन प्रशासकीय कार्यालयांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्यावरील साधारणतः दहा किलोमीटर अंतरामध्ये छोटे-मोठे 30 पूल आहेत. त्यामधील 1960 साली बांधलेला पूल आज अखेरच्या घटका मोजत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या पुलाची दूरवस्था झाली आहे. अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक दुसऱ्या पर्यायी रस्त्याने वळविण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
या संदर्भात बोलताना नाना शिंदे म्हणाले, हा पूल घोड कॅनॉलचा अंतर्गत येत असल्यामुळे या पुलाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे, असे मुख्यमंत्री सडक योजने अधिकारी सांगत आहेत. घोड कॅनॉलच्या अधिकाऱ्यांनाकडे दुरुस्तीची मागणी केली असता, त्यांनी आम्ही पूल दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला आहे, असे सांगून जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.