पुणे – राज्यात सर्वत्र यंदा पावसाने चांगली हजेरी लावली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांनी यंदा सरासरी ओलांडली आहे. मात्र, आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वेध लागले आसून ऑक्टोप्बर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
देशभरात गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून मुक्काम ठोकून असलेल्या मान्सूनने आता परतीचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. पश्चिम राजस्थानपासून सोमवारी मान्सूनने परतीच्या प्रवासास सुरूवात केली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात उत्तरेकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशाच्या बहुतांश भागातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. महाराष्ट्रातून 8 ते 10 ऑक्टोबरपर्यत मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसेच विदर्भातील अनुक्रमे पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या भागांमध्ये 30 सप्टेंबरपर्यत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.