पुणे – राज्यातील कोल्हापूर, सांगली व कराड भागांतील नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत स्वारगेटहून जाणाऱ्या सर्व गाड्या सलग तिसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच, सांगली जिल्हा व कराड भागातील राज्य महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर, सातारा ते कोल्हापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीचे पाणी कोल्हापूर शहरातील मुख्य मार्गावर आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर, सांगली व कराडला जाणाऱ्या सर्व एस. टी. वाहतूक रद्द केल्या आहेत.