नागठाणे – सातारा-पुणे महामार्गावर नागठाणे (ता. सातारा) येथील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी शिवशाही बस दुभाजकावर जाऊन आदळली. या बसमध्ये 31 प्रवासी होते. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
अधिक माहिती अशी, साताऱ्याहून कराडच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसचा नागठाणे गावच्या हद्दीत आल्यावर अचानक टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजकावर जाऊन आदळली. मात्र त्यातूनही चालक दिलीप केसरकर (वय 38, कोल्हापूर) यांनी प्रसंगावधान राखत बस दुभाजकामधील झाडांमध्ये घातली. अन्यथा बस महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एखाद्या वाहनाला धडकली असती आणि भीषण अपघात घडला असता. यावेळी बसमधून 31 प्रवासी प्रवास करत होते.
या अपघातात गौरी मधुकर सद्रे (वय 47, रा. पुणे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. आर्थर रोड तुरुंगाला नीरव मोदीची प्रतीक्षा लंडनमधील स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला 19 मार्चला अटक केली. त्याला परत आणण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील आहेत. त्याच्या विरोधात ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.
तो ताब्यात आल्यास त्याला ठेवण्यात येणाऱ्या आर्थर रोड तुरूंगामधील स्थिती आणि सुविधा याबाबतची माहिती केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून मागितली. त्यानंतर मागील आठवड्यात तुरूंग विभागाने राज्याच्या गृह विभागाला संबंधित माहिती दिली. ती राज्य सरकारने केंद्राकडे सुपूर्द केल्याचे समजते. अशाच प्रकारची माहिती मागील वर्षी मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याशी निगडीत प्रकरणातही देण्यात आली होती. मल्ल्याही ब्रिटनमध्येच आहे. नीरव आणि मल्ल्या भारताच्या ताब्यात आल्यास त्या दोघांनाही एकाच बराकीत ठेवले जाण्याची शक्यता आहे.