शाहदवल बाबा चौकात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
येरवडा – भामाआसखेड धरणाचे पाणी आल्याने येरवडा भागातील पाण्याचा प्रश्न सुटला, असा डामडौल नगरसेवकांनी केला. प्रत्येक प्रभागात जलपूजनाचे कार्यक्रम झाले. परंतु, अंतर्गत भागांत पाणी पुरवठ्यासाठी लागणारी पाइपलाइन योजनेची कामेच झालेली नसल्याचे शाहदवल बाबा चौकात जलवाहिनी फुटल्याने उघड झाले आहे. यातून आज लाखो लिटर पाणी वाया रस्त्यावरून थेट नाल्यात गेले.
शाहदवल बाबा चौकात पिण्याच्या पाण्याची लाइन सकाळी फुटुन पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. वडगावशेरी मतदारसंघात भामाआसखेड प्रकल्पाचे उद्घाटन होऊन महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. भामाआसखेडचे पाण्याचा प्रवाह वेगाने येत असल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या दाबामुळे व्हॉल्व्ह नादुरुस्त होत आहेत. तर, यातून अनेक भागात गढुळ पाणी येत आहे.
येरवडा येथील लक्ष्मीनगर भागाला मंगळवारी (दि. 9) गढूळ पाणी येत असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. त्यातच बुधवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शाहदवल बाबा दर्ग्याजवळ 21 इंच व्यासाची पाइपलाइन फुटली. पाण्याचा मोठा दाब असल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
मुख्य रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतूक संथगतीने सुरु होती. या जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले असले तरी लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही जलवाहिनी फुटल्यामुळे संगमवाडी, आळंदी रस्ता तसेच येरवड्याच्या अर्ध्या भागाला पाणी मिळू शकणार नाही. गुरुवारी (दि.11) दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.
पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल.
– विजय देवकाते, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका