यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट
श्रीनगर : अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्याचे सावट असल्याचे सांगत ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा देत माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. परंतु, पर्यटकांना काश्मीरचा खोऱ्यातील परिसर रिकामा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार पर्यटक परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
अमरनाथ यात्रेदरम्यान, सुरक्षा रक्षकांना यात्रेत शस्त्रास्त्र मिळाल्याने ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करण्यास तसेच लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी अडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी शुक्रवारी अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी अमरनाथ यात्रेच्या भाविकांवर स्नायपर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलाच्या जवानांनी हा हल्ला उधळून लावला, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.