आतापर्यंत 519 जणांकडून अडीच लाखांचा दंड वसूल
येरवडा – करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. पण, काही महाभाग मास्क न वापरता फिरत आहेत. अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, येरवडा वाहतूक पोलिसांनी आतपर्यंत 519 जणांकडून सुमारे 2 लाख 59 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा नियमांचे पालन न करणाऱ्यांचे फोटो काढून त्याची जागेवरच दंडाची पावती फाडण्यात येत आहे. यासाठी पोलिसांनी तीन ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत. यात विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन तसेच शाहदलबाबा चौक या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
पडल्यास मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन येरवडा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसलकर यांनी केले आहे.