मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्यक्तिगत बैठक पार पडली आहे. या बैठकीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचं स्वागतच आहे. या भेटीमुळे राज्याला फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोदी आणि ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली असेल तर चांगलेच आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. अशा भेटीमुळे राज्याला फायदाच होईल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतंही शिष्टमंडळ जेव्हा पंतप्रधानांना भेटायलं जातं. तेव्हा शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकांतात चर्चा होत असते, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्यांवरून फडणवीस यांनी हल्लाबोल केला. राज्य सरकारकडून केंद्राकडे 11 मागण्या मांडण्यात आल्या. त्यातील 7-8 मागण्या तर राज्याशीच संबंधित आहे. त्याचा केंद्राशी काहीच संबंध नाही. केंद्राशी संबंधित मागण्याच केंद्राकडे मांडायच्या असतात, असा टोला त्यांनी लगावला.