पुणे: महात्मा गांधी जयंती निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडुन स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मुळा-मुठा, पवना या नदयांची नदीपात्रे व ओढा-नाले या ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील १७५ महाविद्यालयातील १० हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती
या संदर्भातील तातडीची बैठक आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. राजेश पांडे म्हणाले की, नदी स्वच्छता अभियानही या शहराची गरज आहे. या अभियानात स्वच्छतेबरोबर पुण्यातील ग्रामस्थांचे प्रबोधन करणे देखील आवश्यक आहे. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य मा. प्राचार्य संजय चाकणे यांनी या अभियानाची रूपरेषा मांडली व या अभियानात पुणेकर देखील सहभागी होतील असा आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी या अभियानाचे समन्वयक डॉ. विलास उगले यांनी जलस्त्रोतांना स्वच्छ करणे ही मानवी गरज असुन, त्यामुळे आपण सर्वांनी सहभागी होऊन काम करावे ही आपल्या सर्वाची गरज आहे असे सांगितले. या बैठकीस १०२ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
२ ऑक्टोबर २०१९ रोजी, खडकवासला पुल, शिवणे पुल, राजाराम पुल, म्हात्रे पुल, गरवारे पुल, पुना हॉस्पिटल पुल, झेड पुल, भिडे पुल, ओंकारेश्वर पुल, शनिवारवाडा पुल, कुंभारवाडा पुल, संगमघाट पुल, येरवडा पुल, कल्याणीनगर पुल या ठिकाणी हे स्वच्छता अभियान होणार असुन, पुणेकरांनी देखील या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.