मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिवाळीच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर दीपोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी या कार्यक्रमाचे उद्धाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर राज ठाकरेंबरोबर शिंदे-फडणवीसांची उपस्थितीने राज्यातील राजकीय समीकरण बदलत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंची शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर जवळीकता वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावरती आता भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, “शिवाजी पार्कवरील भेटीकडे राजकारण म्हणून बघण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा पक्ष आम्ही एकाच मताचे आहोत. आमचे विचार आणि ध्येय एकच आहे. त्यामुळे त्यात गैर काय आहे, असं वाटत नाही. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मनसेबरोबरच्या युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील,” असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.