मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत आल्यानंतर सर्वप्रथम अभिनेता अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी तयार करणार असून यासाठी बॉलिवूड कलाकारांसह निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, योगी आदित्यनाथ मुंबईत आले हे मला माहित नाही. ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अक्षय कुमारसोबत बसल्याचे मी पाहिले. त्यांच्यासाठी अक्षय कुमार कदाचित आंब्याची टोपली घेऊन गेला असेल, अशी खोचक टीका त्यांनी केली.
मुंबईतील फिल्मसिटी कोणी हलवण्याची गोष्ट करत, असेल तर तो विनोद आहे. एवढे सोप्पे काम नाही, त्याला एक इतिहास असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर मी योगी आदित्यनाथांना इतकेच विचारतो कि तुम्हाला कोणताही मोठा प्रकल्प तयार करण्याची इच्छा असेल तर करा. परंतु जी फिल्मसिटी नोएडामध्ये तयार केली जात आहे, त्याची आज काय परिस्थिती आहे. किती चित्रपटांचे चित्रीकरण त्याठिकाणी होत आहे? हे पण जरा त्यांनी मुंबईत येऊन सांगावे, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.
तसेच, दक्षिण भारतामधील फिल्म इंडस्ट्री देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबामध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत, असे सवालही संजय राऊत यांनी विचारले आहेत.
Not easy to shift Mumbai’s film city to another place. The film industry in south India is also big, there’re film cities in WB & Punjab too. Will Yogi Ji also visit these places & talk to directors/artists there or is he going to do so only in Mumbai?: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/JTh6UU3CcM
— ANI (@ANI) December 2, 2020