सातारा – करोना व्हायरसच्या भीतीने सातारा शहरात प्रचंड अस्वस्थता आहे. मात्र, शहराच्या स्वच्छतेची काळजी घेणारे सातारा पालिकेचे कार्यालयच अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर अडगळीच्या साहित्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे. रेकॉर्ड रूमच्या पिछाडीलाच सांडपाणी मुरत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
करोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण महाराष्ट्र भयकंपित असून साताऱ्यात करोनाचा रूग्ण नसला तरी वातावरणात प्रचंड अस्वस्थता आहे. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी वारंवार हात धुणे व परिसराची स्वच्छता ठेवणे याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मात्र सातारा पालिकेचे कार्यालयच अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. इमारतीच्या तळमजल्यावर पालिकेतलेच अडगळीचे सामान रचून ठेवण्यात आले आहे.
जुन्या फायली, टेबले, कपाटे, निरुपयोगी कागदपत्रे यांची रेकॉर्ड रूमच्या पलीकडे गर्दी झाल्याने येथे जाताना नाक धरूनच जावे लागते. रेकॉर्ड रुमच्या पिछाडीलाच असणाऱ्या मोकळ्या जागेत एका हॉटेलचे सांडपाणी मुरते. या भागाची कधीच स्वच्छता होत नाही. तळमजल्यावरून बाहेरच्या दुकानांकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड अस्वच्छता व भटक्या कुत्र्यांची गर्दी असते.
पालिकेचे शौचालय दुरुस्त झाल्यावरही पाण्याचे नळ चालू सोडून जाणे व स्वच्छता न पाळण्याच्या सवयीमुळे तीव्र दुर्गंधी येथे जाणवत राहते. आणि करोनाचा संसर्ग टाळा असे सांगणारी सातारा पालिकाच अस्वच्छ असल्याने प्रशासनाचे उपदेश म्हणजे “लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असेच आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचे साताऱ्यात व्यसनमुक्तीचे प्रयोग सुरू असताना सातारा पालिकेत मात्र तंबाखू व गुटख्याच्या सर्रास पिचकाऱ्या पहायला मिळतात. शिक्षण मंडळ कार्यालयाच्या दर्शनी भागाची भिंत पिचकाऱ्यांनी लाल झाली आहे. सातारा पालिकेच्या नवीन प्रवेशद्वारावर कोनशिलेच्या शेजारीच थुंकणारे निर्लज्ज सातारा पालिकेत आहेत. सार्वजनिक आरोग्याची शिस्त पाळायचे भान सातारकरांना उरले नसल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते.
छ. शिवाजी महाराज सभागृहासमोरच्या दर्शनी भागात बंद दरवाजाच्या आड बिनधास्तपणे पिचकाऱ्या मारल्या जातात. मात्र, आरोग्य विभागाने मात्र या बेशिस्तीला अजिबात चाप न लावल्याने पिचकारी बहाद्दर करोना व्हायरस आपसूकपणे कसा पसरेल याची अनुकूलता निर्माण करत आहेत.
टक्केवारीच्या नादात आपली मुलभूत कर्तव्य काय आहेत? याचा विसर आरोग्य विभागाला पडला आहे. पालिकेच्या तळमजल्यावर असणारे अडगळीचे साहित्य तत्काळ हटवावे, अशी मागणी होत आहे.