पहिल्याच दिवशी काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
पिंपरी – शहरात सोमवारपासून (दि.25) दिवसाआड पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. तर, ज्या भागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद ठेवला होता, त्यांची चांगलीच धांदल उडाली. काही ठिकाणी पाणी तर आले परंतु पाणी पुरवठ्याच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
पूर्वी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद होता. आता तर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आज प्रामुख्याने रावेत गावठाण, वाल्हेकरवाडी गावठाण, ताथवडे गावठाण, चिंचवडगाव, तानाजीनगर, सांगवी, दापोडी गावठाण, चिंचवड रेल्वे स्टेशन, चिखली गावठाण, बोऱ्हाडेवाडी, मोशी गावठाण, दिघी गावठाण, संत तुकारामनगर, विशालनगर, पिंपळेनिलख गावठाण, काळभोरनगर, थेरगावमधील काही भाग, पुनावळे आदी परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
तर, रावेत, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, रहाटणी परिसर, थेरगाव गावठाण, वाकड, काळेवाडी, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, निगडी गावठाण, संभाजीनगर, शाहूनगर, भोसरी गावठाण, नेहरूनगर, खराळवाडी, बोपखेल, चऱ्होली, दिघी, डूडूळगाव, वल्लभनगर, कासारवाडी (मध्य), अजमेरा आदी भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. संभाजीनगर, शाहूनगर, वाकड, थेरगाव गावठाण, काळेवाडी आदी भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. विशेषत: चाळीतील इमारतींमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला. सोसायट्यांची पाण्याची मागणीही मोठी असल्याने त्यांचीही मोठी गैरसोय झाली. त्यांना पाणी अपुरे पडल्याने टॅंकर मागविण्याशिवाय पर्याय उरला नाही.
सांगवीकरांना मनस्ताप
सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात रविवारी सायंकाळपासूनच विजेचा लपंडाव सुरु झाला होता. रात्रभर सुरु असलेला विजेचा लपंडाव रविवारी सकाळी नागरिकांसाठी जास्तच त्रासदायक ठरला. या परिसरात बहुतेक नोकरदार कुटुंबे राहत असून सकाळी पती-पत्नी दोघेही नोकरीस जातात. तसेच या ठिकाणी उंच इमारती असल्याने वीज पुरवठाच खंडित झाल्यामुळे पाणी मिळाले नाही. दिवसाआड कपात सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे नागरिकांचा खोळंबा करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना आता दोन दिवस पाण्याची टंचाई सहन करावी लागत आहे. कित्येक नोकरदार दांपत्यांना सायंकाळीच पाणी विकत आणावे लागले.
यावर्षी मे ते जुलै या कालावधीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर, 2016 मध्ये देखील महापालिकेला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर आता अद्याप उन्हाळा आला नसला तरी नोव्हेंबरपासूनच महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.
महापालिकेकडून आज ज्या भागात पाणीपुरवठा बंद ठेवला होता त्या भागातून पाणीपुरवठा बंद असल्याबाबत तक्रारी आल्या. मात्र, ज्या भागात आज पाणी सोडण्यात आले तिथून तक्रारी आल्या नाही. तिथे सुरळीत पाणीपुरवठा झाला. सध्या दररोज 480 दशलक्ष लिटर इतके पाणी सोडण्यात येते. त्या तुलनेत निश्चितच जास्त पाणी नागरिकांना मिळेल. बोअरवेल, विहिरींचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच 50 अनधिकृत नळजोड तोडण्यात आले आहेत.
– मकरंद निकम, सह-शहर अभियंता, पाणीपुरवठा.