मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अश्यातच काल (दि. 23) विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याअगोदर एक घटना घडली ज्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित विधानभवनात दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
अधिवेशनाच्या दिवसाची सुरुवात या घटनेने झाली. दोन्ही नेते एकत्र हसतमुखाने एकमेकांशी बोलत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, अनेक नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली ही भेट काही मिनिटांचीच होती. पण यामागे नक्की काहीतरी राजकीय संकेत आहेत, अशी चर्चा रंगली आहे. अश्यातच यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, त्यामुळे ही भेट निव्वळ योगायोग समजू नका, असे जाणकार बोलू लागलेत. तर तो घडवून आणलेला योग होता..’ असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसेच, कालच्या या भेटीमागे नेमकं काय लॉजिक आहे, तेसुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
देशपांडे म्हणाले, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात सांगितलं. भाजप आणि मनसे एकत्र येऊ नयेत म्हणून 20214, 20217 मध्ये उद्धव ठाकरे यांनी चाली खेळल्या. हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले. तीच भीती ठाकरेंना आहे. भाजप-मनसे युती होईल की नाही माहिती नाही.
पण भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीप्रमाणे तुम्हाला हे सातत्याने सतावतेय. म्हणून काल (दि. 23) जो विधानसभेत घडला, तो योगायोग नव्हता. हे न कळण्याइतकं आम्ही मूर्ख नाहीत. गल्लीतल्या शेमड्या पोरालाही कळेल…’ असं ते म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
संदीप देशपांडे यांना स्टंपने मारहाण…
संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी (दि. 3) हल्ला झाला होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला. यात देशपांडे हे जखमी देखील झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावून आले होते आणि देशपांडे यांना स्टंपने मारहाण केली होती.
यावेळी देशपांडे यांच्या पायाला दुखापत झाली होती. याप्रकरणीच गुन्हे विभागाने कारवाई करत भांडुपमधून दोघांना ताब्यात देखील घेतलं आहे. संदीप दशपांडे यांच्यावर हल्ल्यानंतर हिंदुजा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.