पुणे – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असून, संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी आज शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
आजच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या उपस्थिती होती. दरम्यान, आज शिवजयंतीच्या दिवशी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘भगवा जाणीव’ आंदोलन पुकारलं आहे. किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा फडकत राहावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. शिवजन्म ठिकाण असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज मोठ्या उत्साहात शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली.
मात्र, या सोहळ्यावर अमोल कोल्हे यांनी बहिष्कार घातला असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडावरून निघून गेले की, आपण गडावर जाऊन दर्शन घेणार असल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभारण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने आपण शासकीय सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याच अमोल कोल्हेंनी म्हटलंय.
अमोल कोल्हे काय म्हणाले वाचा…
एवढी वर्षे झाली तरी शिवनेरीवर भगवा ध्वज नाही. शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यात यावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटलो, संसदेच्या पटलावर मागणी ठेवली, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना आग्रही मागणी केली. संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोलविलेल्या खासदारांच्या बैठकीत जाणीव करून दिली होती. भगवा ध्वज आमची अस्मिता आहे. असं कोल्हे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.