मुंबई – जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा घटना समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली. हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चांगलाच गाजला. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केली होती. परंतु, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती देशमुख यांनी दिली असून याप्रकरणी क्लीन चीट दिली आहे. तसेच ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचे गृहमंत्री यांनी सांगितले.
दरम्यान, यासर्व प्रकरणात आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलतांना विरोधी पक्षावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’ कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. यामुळे आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. असंही ते यावेळी म्हणाले.