कॉंग्रेस आणि आपमधील संभाव्य आघाडीबाबत विसंगत चित्र
राहुल आणि केजरीवाल यांनी केले एकमेकांना लक्ष्य
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एकमेकांना लक्ष्य केले. अशातच दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य आघाडीबाबत पुन्हा वाटाघाटी होणार असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळे एकीकडे शाब्दिक युद्ध; तर दुसरीकडे वाटाघाटी असे विसंगत चित्र दोन्ही पक्षांबाबत पाहावयास मिळत आहे.
कॉंग्रेस आणि आपमध्ये हातमिळवणी होण्याबाबत अनिश्चितता कायम असताना राहुल यांनी ट्विटरवरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. संभाव्य आघाडीकडून भाजपच्या पराभवाची निश्चिती करण्यासाठी कॉंग्रेस दिल्लीतील लोकसभेच्या 7 पैकी 4 जागा आपला देण्यास तयार आहे. मात्र, केजरीवाल यांनी चर्चेबाबत पुन्हा एकदा घूमजाव केले. वाटाघाटींसाठी आमचे दरवाजे अजूनही खुले आहेत. पण, वेळ निघूून चालली आहे, असे राहुल यांनी म्हटले. त्यावरून केजरीवाल यांनी राहुल यांच्यावर ट्विटरवरूनच पलटवार केला. कसले घूमजाव? अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा नसून केवळ दिखावा केला जात असल्याचे आपल्या ट्विटवरून वाटते. मोदी-शहांच्या धोक्यापासून देशाला वाचवणे हा आजचा प्रमुख मुद्दा आहे. दुर्दैवाने, उत्तर प्रदेश आणि इतर काही राज्यांत मोदीविरोधी मतांचे विभाजन करून तुम्ही त्यांनाच मदत करत आहात, असे प्रत्युत्तर केजरीवाल यांनी दिले.
पवारांच्या मध्यस्थीने उद्या होणार चर्चा
कॉंग्रेस आणि आपमध्ये बुधवारी चर्चेची नवी फेरी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीतून होणारी ती दोन्ही पक्षांची दुसरी बैठक ठरेल. त्या बैठकीत कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व अहमद पटेल, तर आपचे प्रतिनिधित्व संजय सिंह करणार आहेत. आपकडून दिल्लीबरोबरच हरियाणा आणि चंडीगढमध्येही हातमिळवणीचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे समजते. त्याशिवाय, दिल्लीत 5 जागा लढवण्याच्या भूमिकेवर आप ठाम राहणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.