26 जानेवारी रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश बनला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खास लेख.
“भारतीय प्रजासत्ताक दिन’ हा समस्त भारतीय जनतेच्या जीवनातील एक महत्त्वाचा, मौल्यवान तसेच भाग्याचा दिवस आहे. याचे कारण असे की, या दिवशी आपल्या देशाची एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. या देशात सर्वसामान्य जनतेची, अर्थात प्रजेची, म्हणजेच लोकांची सत्ता प्रस्थापित झाली. लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य स्थापन झाले. त्यासाठी देशाला एका बलदंड संविधानाची निर्मिती होणे आवश्यक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता संविधान निर्मितीची जबाबदारी स्वीकारली.
भारतीय संविधान म्हणजे भारतीय जनतेसाठी घालून दिलेली जणू आचारसंहिताच आहे. घटना समितीच्या अथक प्रयत्नांतून, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वतापूर्ण अध्ययन आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करून तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यातून भारतीय संविधान जन्माला आले. इतर व्यक्ती, स्थळ, महात्मे, अशा कुठल्याही गोष्टींना महत्त्व न देता केवळ भारतीय नागरिकाला अर्थात या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक जनतेला 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान समर्पित केले. आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली, ती या दिवसापासूनच. अथक परिश्रमाने आणि रात्रीचा दिवस करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट आणि विशाल असे संविधान तयार केले. जगभरातील लोकशाही देशांमध्ये भारतीय संविधानाची ख्याती आहे. इतकेच नाही तर सर्व कायदे, कलम आणि परिशिष्टांची विस्तृत मांडणी हेही भारतीय संविधानाचे जागतिक वैशिष्ट्य आहे. जगात इतके विस्तृत आणि स्पष्ट उल्लेखित संविधान कोणत्याही देशाजवळ नाही. आजपर्यंत या संविधानाची समीक्षा अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी केली आहे.
भारतातील समाजव्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. सामान्यातील सामान्य माणूस असो किंवा अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती असो, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात धारणा होती. या सर्व घटकांचा सूक्ष्मपणे विचार करून त्यांनी संविधानाची मांडणी केली आहे.
या स्वतंत्र भारत देशात संविधान अर्थात घटना अस्तित्वात आली, त्याचबरोबर काही मूल्येही आली. स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही त्यातील काही महत्त्वाची मूल्ये होत.या देशातील संविधान अमलात येण्याच्या आधी या देशात प्रचंड विषमता होती. अशा परिस्थितीत खरा एकसंघ समाज निर्माण होणे, हे मुख्य ध्येय संविधानकर्त्यांच्या मनात होते. या देशातील प्रत्येक नागरिकाला दुसऱ्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटला पाहिजे, दुसऱ्याचे जे सुख दुःख ते आपले सुख दुःख वाटले पाहिजे, इतरांचे यश ते आपले यश वाटले पाहिजे, तरच या देशात लोकशाही समाजवादाची निर्मिती झाली असे म्हणता येईल. संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला, त्यावेळी अशा उदात्त मूल्यांचा विचार करण्यात आला होता, मात्र गेल्या 74-75 वर्षांत तशी लोकशाही आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत काय, हा खरा प्रश्न उपस्थित होतो, अर्थात, त्या दृष्टीने या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विचारमंथन होणे आवश्यक आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान संविधानकार जगात अजूनपर्यंत झालेला नाही’, असा आजवर स्पष्ट उल्लेख अनेक देश विदेशातील घटनातज्ज्ञांनी केला आहे. भारतातील समाजव्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. आजपर्यंत संविधानाची वाटचाल दीपस्तंभासारखी राहिली आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाचा गौरव वाटतो. भारतीयांनाही त्याचा गौरवच आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेला भारतीय संविधान सुपूर्द करताना म्हटले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाचे यश हे ते संविधान चालविणाऱ्यांवर आणि त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. बाबासाहेबांचा हा संदेश आजही, भविष्यासाठीही तितकाच मार्गदर्शक आहे.
या देशाचे संविधान निश्चितच श्रेष्ठ आहे. ते योग्यप्रकारे राबवणे ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. आपले कर्तव्य आणि जबाबदारी भारतीयांनी नीटपणे सांभाळले तर देशाचे चित्र बदलू शकेल. संविधानाकडे या देशातील विकासाचा दस्ताऐवज म्हणून पहायला हवे. संविधानातील तरतुदी कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. राजकीय नैतिकता आणण्याचा आग्रह धरायला हवा. वैज्ञानिक दृष्टी बाळगणे आणि त्या वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे हे संविधानानुसार (कलम 51-क नुसार) प्रत्येक भारतीयांचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी अंधश्रद्धेला मुळापासून उपटून फेकायला हवे. संपत्तीचे समान वितरण करण्यासाठी संपत्तीची सीमा निर्धारित करायला हवी. संपत्ती जरी सीमित करण्याचा कायदा केला, तरी या देशातली गरिबी, बेरोजगारी, कुपोषण संपुष्टात येतील.
देश विज्ञानाच्या बळावर महासत्ता बनेल. जपान, जर्मनी याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या देशांना संविधान बदलण्याची गरज पडली नाही. त्यांनी फक्त देशाची मानसिकता बदलली. देशाचा विकास झाला. भारतातही मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस बदलला तर देशही बदलेल. देशाचा विकास होईल. भारतीय संविधानातील कायदे आजच्याही परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहेत. आजच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्या कायद्यांचा वापर कसा करायचा याचा कृतिकार्यक्रम बनविण्याची गरज आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आपल्या अस्मितेचा विषय झाला पाहिजे. हा दिवस राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे. देशाची लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले गेले पाहिजे. मात्र, दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. मग हेच काय प्रजासत्ताक राष्ट्राचे स्वरूप, असा प्रश्न मनात उपस्थित होतो.
शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, शेती, संरक्षण या क्षेत्रातील अनेक प्रश्नांचा जणू काही ढीगच आपल्या समोर उभा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मानसिकता वाढीस लागणे गरजेचे आहे. संविधान कृतिशीलपणे राबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध राहिले पाहिजे, शिवाय आपल्या राष्ट्रप्रेमाची व राष्ट्रभक्तीची प्रेरणादायी मशाल जागृत केली पाहिजे, तर आणि तरच भारतीय प्रजासत्ताक चिरायू होईल.