पुणे -हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 230 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यान 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले असून बांधा-वापरा-हस्तांतरण करा या तत्वावर (बीओटी) हे काम केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण सुमारे 6 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पास सर्व प्रकाराची मंजुरी राज्य सरकारने यापूर्वीच दिली आहे.
हा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यात येणार असला, तरी त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी वीस टक्के, तर टाटा कंपनी साठ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे व्हायबल गॅप फंडिंगच्या स्वरूपात केंद्र सरकारकडून 1 हजार 230 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव पीएमआरडीएने सहा महिन्यांपूर्वीच पाठविला होता.
मध्यंतरी त्याबाबत केंद्र सरकारकडून प्रस्तावातील काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्यात सुधारणा करून पीएमआरडीएने पुन्हा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे.