पुणे : जेईई आणि नीट परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असणारी एमएचटी-सीईटी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत जाहीर झाला, पण अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह अन्य अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठी आणखी दोन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. करोनामुळे कोलमडलेले व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष प्रवेशाला सप्टेंबर महिना उजाडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) जुलैमध्ये होणार आहे. तर अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा करोनापूर्व काळात बारावीची परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यात घेतली जात होती. मे अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने प्रवेश परीक्षांचे निकालही जाहीर व्हायचे आणि प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची. यंदा मात्र सीईटी ऑगस्ट महिन्यात जाहीर केल्याने सर्वच प्रक्रियेला विलंब होणार आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत जाहीर होऊनही शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. तथापि, सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर व्हायची आहे. त्यामुळे सध्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
काही महाविद्यालयांनी सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचे काही प्राचार्यांनी म्हटले आहे. एवढे असली तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग 30 सप्टेंबरपूर्वी सुरू करण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिले आहे. त्यापूर्वी सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन महाविद्यालयाचे वर्ग वेळेत सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा काही प्राचार्यांनी सांगितले आहे.