मुंबई – सध्या परमबीर सिंग यांचा लेटरबाॅम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर आज त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
“मी लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बाॅलिंगही करायचो. फिल्डिंग करत असताना माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला खूप मजा येते. आता माझं ठरलंय, मी फास्ट बाॅलिंगही करणार, गुगलीही करणार आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शाॅट्सदेखील खेळणार आहे”, असे फडणवीस म्हणाले होते यावर आता संजय राऊत यांनी राजकारणात कुणावरही इतका विश्वास टाकायचा नसतो, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘देवेंद्र फडणवीस यांनी लूज बॉलवर फटकेबाजी जरूर करावी. पण मोठ्या विकेट या लूज बॉलवरच जातात, हे त्यांनी लक्षात ठेवावे, राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे.’ असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे.