मुंबई : बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या या वाक्यावर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना 100 टक्के भान ठेवलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
बाबरी मशिद विद्ध्वंसावरुन बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांचे कां टोचले आहेत. याविषयी बोलताना, “राजकारणात स्थान टिकवायचं असेल तर संयमाने बोलावं लागतं,” असेही केसरकर यांनी यावेळी म्हटले. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहांनी आधीच नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असे केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे बोलताना दीपक केसरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. “बाळासाहेबांच्या नावावर आम्ही तुम्हाला देखील प्रेम दिलं. तुम्ही विचार सोडला तेव्हा आम्ही तुम्हाला सोडलं, असं केसरकर म्हणाले. माझ्या जिल्ह्यातले 400 कोटी रुपये त्यांनी परत घेतले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तुम्ही काय न्याय दिला? तुमचं पंतप्रधानांशी काय बोलणं झालंय? किती चांगल्याने त्यांनी तुम्हाला वागवलं? असे थेट प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.
त्याच बरोबर पुढे बोलताना त्यांनी, ‘ज्येष्ठ शिवसैनिकांना कधीही उद्धव ठाकरे भेटले नाहीत, मोदी साहेबांवर कायम टीका करता. मातोश्रीचा मान देखील तुम्ही संपवला आहे. सहानुभूतीची लाट निर्माण करणं आणि कार्यकर्त्यांना सोबत ठेवायचं एवढंच काम यांच्याकडे राहिलं आहे’, असा थेट हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.