पाबळ – दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ओमायक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील व्यवसायावर अवकळा आली असून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर मंदीचे सावट आले आहे.
पाबळ भागात याविषयी चर्चा सुरू असून आता हा नवा करोना किती दिवस चालणार? अशी नाराजी व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. या चर्चेतील मोठी नाराजी आठवडे बाजार करीत असलेल्या व्यवसायिक वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या यात्रांवरही मोठा परिणाम होत असून काही मोठ्या गावांच्या यात्रा आता तोंडावर येऊन ठेपल्याने त्यात बैलगाडा शर्यती, लोकनाट्य आदी कार्यक्रम होणार का, नाही याबाबत मोठ्या चर्चा झडत आहेत.
याबाबत पाबळ भागात मोठी नाराजी व्यक्त केली जात असली तरी ओमायक्रॉनच्या माध्यमातून व पूर्वीचा करोना काळाचा अनुभव लक्षात घेता भयाचेही मोठे सावट असल्याचे दिसून येत आहे. पाबळ येथे श्री भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते तर बैलगाडा शर्यतीचा मोठा उत्सव असतो.
सध्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुन्हा एकदा करोना प्रादुर्भाव सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आलेली बंधने यामुळे सतत तिसऱ्या वर्षी तरी यात्रा होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
…तर आणखी वेगळे चित्र दिसले असते-
शासनाचे चौकटीत यापूर्वी करोनाचा प्रतिकार करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो पण मृत्यूभय कमी असल्याचे दिसून येत आहे. तरीही मोठा प्रादुर्भाव होत नसल्याचे कारण झालेले लसीकरण ही बाब आता सर्वमान्य केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शंभर टक्के लसीकरण झाले असते तर आणखी वेगळे चित्र दिसले असते.