नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने करण्यासाठी सर्वजण एकीकडे सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात करोनाने नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. कारण मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची वाढ होऊ लागली आहे. ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
राज्यात बुधवारी 3 हजार 900 नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून राज्यातील करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. तर, राज्यातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 252 वर पोहचला आहे.
मुंबईतही करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईमध्ये 2510 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 251 बाधितांनी करोनावर मात केली आहे. एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 8060 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
राज्यात बुधवारी 20 बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 6 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात गुरुवारी 85 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी 53 ओमायक्रॉनबाधित हे मुंबईतील आहे. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 137 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 252 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 99 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.