जालना – करोना विषाणूचा नवा अवतार (व्हॅरियंट) ओमिक्रोन सध्या जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा कारण ठरला आहे. भारतात करोना विषाणूची भयावह दुसरी लाट आणण्यासाठी कर्णीबभूत ठरलेल्या डेल्टा व्हॅरियंटपेक्षाही ओमिक्रोन भयानक असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. विषाणूच्या या नव्या अवतारामुळे भारताचं टेन्शन देखील वाढलं आहे. अशातच करोना महासाथीचा देशात सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता ओमिक्रोनचे संकट येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. करोनाच्या ओमिक्रोन व्हॅरियंटबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे.
आज चिंता करण्याचं कारण नाही. फक्त…
ओमिक्रोनबाबत जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सध्याच्या घडीला चिंता करण्याचं कारण नसलं तरी काळजी घ्यावी लागणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “दुसरी लाट डेल्टाने निर्माण केली, तशी तिसरी लाट अशा वेगळ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी त्याचा प्रसार आपण वेळेत थांबवला, तर आज चिंता करण्याचं कारण नाही. फक्त सतर्क राहावं लागेल एवढं मात्र नक्की”
राज्यात कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही
राज्यात ओमिक्रोन व्हॅरियंटचे रुग्ण अद्याप आढळले नसल्याची माहिती देताना टोपे यांनी, “आपण प्रत्येक जिल्ह्यातून साधारणपणे महिन्याला १०० सॅम्पल्स घेतो. त्यांचं जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. त्यातून डेल्टा व्हेरिएंटच आहे की अजून काही नवीन व्हेरिएंट आहेत हे तपासत असतो. हा प्रकल्प अजूनही सुरूच आहे. त्यात अजून तरी नवीन कोणताही नवीन व्हेरिएंट आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम आपण करू” असं सांगितलं.
दरम्यान महाराष्ट्रात येत्या १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. करोनाचा नवा ओमिक्रोन व्हॅरियंट सापडल्याने हा निर्णय मागे घेतला जातो का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आरोग्यमंत्र्यांनी यावर खुलासा करताना पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार येत्या १ डिसेंबरपासून राज्यात शाळा सुरु करण्यात येतील असे स्पष्ट केले.