नवी दिल्ली – करोना विषाणूचा नवा व्हॅरियंट ‘ओमिक्रॉन’ सध्या जगासाठी चिंतेचे कारण बनला आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या हा नवा व्हॅरियंट आधीच्या विषाणूपेक्षा अधिक धोकादायक ठरेल असे मत शास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. जगातील अनेक देशांनी या विषाणूचा शिरकाव आपल्या देशामध्ये होऊ नये यासाठी ओमिक्रॉन व्हॅरियंटचे रुग्ण आढळलेल्या प्रदेशावर प्रवासबंदी लादली आहे. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत, ओमिक्रॉन व्हॅरियंटचे रुग्ण आढळलेल्या प्रदेशातून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर तात्काळ बंदी लादावी अशी मागणी केली आहे.
देशातील करोना विषाणू महासाथ आटोक्यात आल्याचे चित्र असल्याने सध्या सरकारने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस परवानगी दिली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीतून देशात करोना विषाणूचा नवा व्हॅरियंट ‘ओमिक्रॉन’ प्रवेश करू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
केजरीवालांचे मोदींना पत्र
‘ओमिक्रॉन’ व्हॅरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी, “ओमिक्रॉन व्हॅरियंटचा भारतात प्रवेश होऊ नये यासाठी देशाने सर्व संभाव्य प्रयत्न करायला हवेत. युरोपियन युनियनसह अनेक देशांनी ‘ओमिक्रॉन’ व्हॅरियंटने प्रभावित प्रदेशात प्रवासास बंदी घातली आहे. मी आपल्यास विनंती करतो की या प्रदेशातून भारतात होणारी हवाई वाहतूक तातडीने थांबवण्यात यावी. यामध्ये दिरंगाई केल्यास बाधित रुग्णांचा देशात प्रवेश होऊन देशासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.” अशी मागणी केली आहे.
केजरीवाल यांनी लिहलेल्या पत्रात देशाने गेली दीड वर्ष करोना विषाणूशी अत्यंत अवघड असा लढा दिल्याचं नमूद केलं आहे. हा लढा लढण्यामध्ये कोव्हीड वॉरियर्सचं मोठं योगदान असल्याचं देखील केजरीवाल यांनी म्हंटल आहे.