पुणे, – ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग झाला असल्याचे आणि अनेक शहरांमध्ये तो प्रभावशाली असल्याचे इन्साकोगने जाहीर केले आहे. त्यानंतर या आजारात अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांच्या जनुकीय चाचणीची आणि संसर्गित क्षेत्रावर (क्लस्टर) लक्ष देण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
आपण जनुकीय संरचना तपासण्यासाठी नमुने गोळा करण्याची पद्धत बदलली पाहिजे. विमानतळावर लक्ष केंद्रित करण्याचा कोणताही फायदा नाही. अतिदक्षता विभागातील किंवा तीव्र लक्षणे असणाऱ्या वैद्यकीय नमुन्यांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. विषाणूत काही बदल होतो का? स्थानिक वस्ती, पार्टी किंवा सामुदायिक समारंभ यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्यामुळे अचानक संसर्गितांची संख्या वाढू शकते. तसेच व्यापक प्रमाणात निकष न लावता चाचणी घेतली पाहिजे, असे मत सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलरचे माजी संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी व्यक्त केले.
केवळ चाचणी आणि संपर्कातील व्यक्ती शोधल्याने ओमायक्रॉनचा प्रसार रोखता येणार नाही. कारण, तो वेगाने पसरणारा आहे. चाचणी ही महत्त्वाची असली तरी संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची सक्ती रद्द केली पाहिजे, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. ते सध्या टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक आहेत.
गेल्या काही आठवड्यांत तीन हजारपेक्षा अधिक जणांना ओमायक्रॉन आवृत्तीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी एक हजारपेक्षा अधिक जणांचा समावेश आहे.
सध्याच्या लाटेतून आपणास काय समजले तर ही अत्यंत स्फोटक वेग आणि त्सुनामीसारखी पसरते. मुंबई आणि दिल्लीसारख्या भागात संसर्गात घट दिसत आहे. तर पुणे आणि बेंगळुरूसारखी महानगरे पीकवर आहेत. ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांच्यात प्रतिकारशक्ती तयार झाली नसल्याने त्यांना धोका अधिक आहे. आम्ही आमचे धोरण लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर केंद्रित केले आहे. (80 ते 90 टक्के संसर्गितांमध्ये लक्षणे नाहीत) प्राण वाचवणे आणि आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवणे यावर आमचा प्रकाशझोत आहे, असे करोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.
दुसऱ्या डेल्टा लाटेपेक्षा सध्याच्या ओमायक्रॉन लाटेत गंभीर आजारी असणाऱ्यांची संख्या कमी आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरजही कमी भासत आहे. महाराष्ट्रात पाच ते दहा टक्केच संसर्गित डेल्टाचे आढळत आहेत. ओमायक्रॉनपासून डेल्टा संसर्गित वेगळे काढण्याची गरज भासू शकते. कारण, त्यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते, असेही डॉ. जोशी म्हणाले.