टोकियो ऑलिंपिक स्पर्धेची सुरुवात भारतासाठी गोड ठरली आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी महिला वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात देशाला रौप्यपदक आणि स्पर्धेतील पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून दिलं आहे. चानू यांच्या यशाबाबत देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने खेळाडूंच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या प्रशिक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने केलेल्या घोषणेनुसार पदक विजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकास १२.५ लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकास १० लाख तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकास ७.५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
दरम्यान, वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी लिहतात, “भारताची टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील सुरुवात उत्तम झाली. मीराबाई चानू यांच्या विलक्षण कामगिरीमुळे संपूर्ण भारत देश आनंदोत्सव साजरा करतोय. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी रौप्यपदक पटकावल्याबाबत त्यांचे अभिनंदन. त्यांचे हे यश प्रत्येक भारतीयांसाठी स्फुर्तीदायक आहे.”
याबरोबरच पंतप्रधानांनी स्वतः मीराबाई चानू यांच्याशी संपर्क साधत त्यांचे कौतुक केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्याबाबत मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.” अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.
Indian Olympic Association announces cash rewards to athlete coaches winning medals in Tokyo. Coach of athlete winning Gold medal to be given Rs 12.5 lakhs,coach of athlete winning Silver medal to be given Rs 10 lakhs&coach of athlete winning Bronze medal to be given Rs 7.5 lakhs
— ANI (@ANI) July 24, 2021