काठमांडू- भारतासोबत विनाकारण कटूता घेत भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट करून घेण्याचा मुजोरपणा नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा आली यांच्या चांगल्याच अंगलट आला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली असतानाच त्यांनी आज अचानक त्या देशाच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. दरम्यान, नेपाळचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले असून ओली लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचा अंदाज आहे.
या सगळ्याची सुरूवात त्या वादग्रस्त नकाशावरून झाली. भारताच्या उत्तराखंडमधील तीन गावे नेपाळचा भाग असल्याचा नकाशा तयार करण्यात आला आणि नेपाळच्या संसदेने त्याला मंजूरीही दिली. भारताने या कृतीला विरोध केला. मात्र हा विरोध डावलून नकाशाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतरही ओली यांची भारतविरोधी शेरेबाजी थांबली नाही.
करोना विषाणूपेक्षा भारतातून आलेला विषाणू अधिक घातक असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. भारत आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या प्रत्येक आरोपाचे भारताने खंडन केले तरी त्यांचे आरोप सत्र सुरूच होते.
दरम्यान, नेपाळमध्ये दोन कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे. त्यात पंतप्रधान पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. मात्र ओली यांनी भारतासोबत विनाकारण वाद ओढवून घेतल्यामुळे स्वत:चे आसन अस्थिर करवून घेतले आहे. त्यांच्या काळातच नेपाळ चीनकडे अधिक झुकत असल्याचे निदर्शनास येत होते व देश चीनच्या सापळ्यात अडकत गेला.
आता माजी पतंप्रधान पुष्पकुमार दहल उर्फ प्रचंड हेही सक्रिय झाले असून त्यांनी ओली यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या विरोधी हल्ल्यानंतर ओली यांच्या पक्षातील नेतेही आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहे. ओली यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद आणि पंतप्रधान पद अशी दोन महत्वाची पदे आहेत.
भारत आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहे, हा जो आरोप ओली यांनी केला आहे, तो अगोदर त्यांनी सिध्द करून दाखवावा असे आव्हान आता प्रचंड यांनी दिले आहे. केवळ एवढेच नाही, तर ओली यांच्या असल्या वक्तव्यांनी विनाकारण दोन्ही देशांचे संबंध बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बजावले आहे. एकूणात वादग्रस्त नकाशा प्रकरण ओली यांना चांगलेच भोवले असून त्यांना लवकरच पायउतार व्हावे लागेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.