सौदीच्या नवीन तेल मंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली : सौदीतील तेल उत्पादन केंद्रांवर झालेल्या हल्ल्यामुळे तेथील तेल उत्पादनांत मोठाच खंड पडला आहे. तथापी त्याचा आम्ही भारताच्या तेल पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊ देणार नाही अशी ग्वाही सौदीचे नवे तेल मंत्री अब्दुलअझिज बिन सलमान यांनी दिली आहे. भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्याशी फोन वर संपर्क करून तेल पुरवठ्याबाबतची स्थिती जाणून घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
सौदीतील तेल उत्पादन केंद्रांवर जो हल्ला झाला त्यातून रोज पाच दशलक्ष बॅरल्स इतके तेल उत्पादन कमी झाल्याने सौदीकडून भारताला जो तेल पुरवठा होणे अपेक्षित होते तो होईल की नाही याची शंका निर्माण झाली होती. तथापी भारताला तेल व एलपीजी पुरवठा करण्याबाबत जे प्रमाण आणि वेळापत्रक निश्चीत करण्यात आले होते ते पुर्ण क्षमतेने पाळले जाईल त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही असे सौदीच्या तेल मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की सौदीत रोज 11 दशलक्ष बॅरल्स इतके तेल उत्पादन केले जाते.
सध्या ही उत्पादन क्षमता काही प्रमाणात कमी झाली असली तरी ही उत्पादन क्षमता आम्ही या महिन्याच्या अखेरीपर्यंत साध्य करू. आणि नोव्हेंबरपासून आम्ही आमचे तेल उत्पादन रोज 12 दशलक्ष बॅरल्स इतके करू असेही सौदी अरेबियाने म्हटले आहे. त्यामुळे भारताला चिंता करण्याचे कारण उरले नाही असे ही प्रधान यांनी म्हटले आहे. सौदी अरेबिया हा भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा मोठा देश आहे. या देशाकडून भारत दर महिन्याला दोन दशलक्ष टन तेलाची आयात करतो.