राजकीय नेत्यांचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष
बिदाल: माण तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस नसल्याने डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. माण तालुक्याचे अर्थकारण हे डाळिंब पिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी लाखों रुपये खर्च करावी लागत आहे. रोगराई आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी पुरता वैतागला आहे.
डाळिंबावर पडलेले रोग आणि दर मिळत नसल्याने बागलाण तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवून डाळिंबाची झाडे जमीनदोस्त केली. तेल्या व मर रोगामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडले आहेत. तसेच कांदा व भाजीपाल्यालाही दर नसल्याने उत्पादक हतबल झाले आहेत.
माण तालुक्याच्या उत्तर भागातील बिदाल, टाकेवाडी, तोंडले, पाचवड, वावरहिरे, आंधळी या परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरण व अधुनमधून येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरीमुळे पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. मका पिकावर ही लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ऑगस्ट महिन्यातील उन्हाचा कडाका व वातावरणातील आर्द्रता वाढली होती. त्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी उसाची व डाळिंब पिकाची जोपासना केली होती. परंतु पिकास केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
उत्तर माणच्या पट्यात सतत दुष्काळ औषध फवारणी, खर्च व भाव नसल्याने खर्च निघेनासा झाला आहे. यामुळे नैराश्ये येऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंब बागा नष्ट केल्या आहेत.
उत्तर माणमधील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पादनाचा डाळिंब पीक मुख्य घटक आहे. सध्या डाळिंब पिकांवर तेल्या रोगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र माणमधील राजकीय नेते आमदार होण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांच्या समस्याकडे त्यांचे लक्ष नसते.
प्रा. किरण जगताप
डाळिंब उत्पादक, आंधळी