नवी दिल्ली – ऊस व मळीपासून तयार करण्यात येत असलेल्या इथेनॉलकडे इंधन कंपन्या दुर्लक्ष करीत आहेत. त्या ऐवजी धान्यापासून तयार केलेल्या इथेनॉलला प्राधान्य देत आहेत असा आरोप साखर कारखानदारांच्या संघटनेने केला आहे.
साखर कारखानदारांच्या संघटनेचे अध्यक्ष नीरज श्रीगावकर यांनी सांगितले की, आम्ही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. इंधन कंपन्या उस व मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलकडे दुर्लक्ष करीत आहेत. इथेनॉल निर्माण करण्यासाठी तेल कंपन्यांकडून पूर्वीसारखी गुंतवणूक होताना दिसत नाही. केंद्र सरकारने इंधनात ईथेनॉलचे प्रमाण 2025 पर्यंत 20 टक्के वाढविण्याचे ठरविले आहे.
गेल्या पाच-सहा वर्षापासून यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. मात्र तेल कंपन्यांनी जर साखर कारखान्यांच्या इथेनॉलकडे दुर्लक्ष केले तर हे उद्दिष्ट सहजासहजी साध्य होऊ शकणार नाही. सध्या इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 8.1 टक्क्यांवर आले आहे. वर्षाच्या अखेरीस हे प्रमाण दहा टक्के होण्याची शक्यता आहे.
याच गतीने जर इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढले तर 2025 पर्यंत हे प्रमाण 20 टक्के होऊ शकते. एकीकडे तेल कंपन्या धान्याच्या आधारावर तयार केलेल्या इथेनॉलसाठी दीर्घ पल्ल्याचे खरेदीचे करार करीत आहेत. तर अशा प्रकारचे करार साखर कारखान्याबरोबर केले जात नाहीत.
त्यामुळे साखर कारखान्यांना प्रकल्प विस्तारासाठी बॅंकाकडून कर्ज मिळत नाही अशी अडचण निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदर धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उत्पादन सुरू झाले नसताना अन्न मंत्रालय अशा प्रकारच्या प्रकल्पांना गरजेपेक्षा जास्त मंजुरी देत आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.