थकबाकी न भरल्यास प्रमुख विमानतळांवरील इंधन पुरवठा होणार बंद
नवी दिल्ली : कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तेल कंपन्यांनी एअर इंडियाला शेवटच्या इशारा देत थकबाजी भरण्याची आजचा शेवटचा दिवस दिला आहे. जर कंपनीकडून थकबाकी भरली नाही तर देशातील प्रमुख विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद करण्याची धमकीदेखील तेल कंपन्यांनी दिली आहे.
तेल कंपन्यांनी एअर इंडियाला शेवटचा इशारा देत 11 ऑक्टोबरपर्यंत कंपनीने थकलेली रक्कम एकरकमी भरली नाही तर इंधन पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची धमकी दिली आहे. गुरुवारी एअर इंडियाला पाठवलेल्या पत्रात इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तीन ऑईल पीएसयूने म्हटले आहे की- आश्वासनानुसार मासिक एकरकमी देय रक्कम देण्यात आली नसल्याने थकबाकीची रक्कम वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑगस्टमध्ये तीन इंधन विक्रेत्यांनी सांगितले की, एअर इंडियाचे थकबाकीचे इंधन बिल 5,000, कोटींवर पोहचले आहे, जे जवळजवळ आठ महिन्यांपासून भरलेले नाही.
22 ऑगस्ट रोजी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) ने पैसे न मिळाल्यामुळे कोची, मोहाली, पुणे, पाटणा, रांची आणि विजाग येथील सहा विमानतळांवर एअर इंडियाला पुरवठा बंद होता. तथापि, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी 7 सप्टेंबर रोजी पुन्हा इंधन पुरवठा सुरू केला.