चौघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळोची – चक्क निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या शेत जमिनीतील विहिरीतील पाण्याची चोरी झाल्याचा प्रकार घडला. करोना महामारीपासून पाण्याची चोरी झाली आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर तुकाराम रोकडे (वय 65, रा. अंबरनाथ, जि. ठाणे, मूळ रा. सुपे, ता बारामती) यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहूल ज्ञानेश्वर जाधव व अतुल ज्ञानेश्वर (सर्व. रा. सुपे ता. बारामती) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार (दि.10) फेब्रुवारी 2020 ते 6 ऑगस्ट 2022 या काळात ही घटना घडली. रोकडे यांचे मूळ गाव बारामती तालुक्यातील सुपे हे आहे. त्यांची येथे गट क्रमांक 264 मध्ये त्यांचे 4 हेक्टर 67 आर शेतजमीन आहे. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर रोकडे हे अंबरनाथ येथे स्थायिक झाले आहेत. मात्र ते अधूनमधून गावी येत त्यांच्या शेतीत ज्वारीचे पिक घेत होते.
महामारीच्या काळात रोकडे हे त्यांच्या गावी असणाऱ्या शेतात न आल्याचा फायदा घेत संशयितांनी विजेचा मीटर बसवून त्यांनी रोकडे यांच्या शेतजमिनीत असणाऱ्या विहिरीतील लाखो लिटर पाणी वापरले. ही विहिर स्वतःच्याच शेतात असल्याचे सिद्ध करण्यासाठी फिर्यादीने दरम्यानच्या काळात जमीन मोजणी करीत हद्द निश्चिती करून घेतली.
विहिरीतील पाणी चोरल्याच्या कारणावरून फिर्यादीने संशयीतांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट घेतली नाही. फिर्यादी रोकडे यांनी यासंबंधी प्रकाश व राहूल यांची शेतात भेट घेतली. परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.