सातारा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांचा जिल्ह्यात दौरा झाला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार या नात्याने मला माहिती द्यायला हवी होती. ती न दिल्यामुळे मला दौऱ्याची कल्पनाच नव्हती. मी उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकलो नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाही, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, “याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते.
माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हाला दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही.’ मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादा भुसे आदी मंत्री नुकतेच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र या दौऱ्याची पुसटशी कल्पना खासदार या नात्याने प्रशासनाने दिली नाही. यामुळे त्यांना भेटता आले नाही, असे त्यांनी सांगितले.