बंगळुरू : शहरातील मल्लेश्वरम् भागातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय काल रात्री पेटवून देण्यात आले. मात्र यातील आरोपींची ओळख अद्याप पटली माही. मोटारसायकलवरून आलेल्या काही जणांनी पेट्रोल ओतून रात्री दीडच्या सुमारास पेटवले. त्यांनी कार्यालयाच्या आवारात लावलेल्या वाहनांनाही पेटवून दिले.
या आगीत कार्यालयाजवळ उभ्या केलेल्या सहा मोटार सायकली जळून खाक झाल्या. सुधारीत नागरीकत्व कायद्याला भाकप करत असलेल्या विरोधामुळे संतापलेल्या लोकांचे हे कृत्य असावे, असा संशय पक्षाचे प्रदेश सरचिटणीस साथी सुंदरेश यांनी म्हटले आहे.
लोकांना मिळालेल्या लोकशाहीत्मक हक्कावर हा थेट हल्ला आहे. पक्षाच्या वतीने या कायद्या विरोधात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या केरळ दौऱ्यात झालेल्या निदर्शनामुळे दुखावलेल्या काही जणांचे हे कृत्य असू शकते.
आवारात ठेवलेल्या सहा मोटारसायकली जाळून टाकल्या आहेत. त्याबाबत व्यालीकवल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. आरोपींना पकडल्यानंतर त्यामागील हेतू स्पष्ट होऊ शकेल.