दुर्घटनेनंतर पंचनामा करण्याबाबत उद्यान निरीक्षकांची उदासीनता
वडगावशेरी – खराडी येथील श्री हॉस्पिटल सातववस्तीजवळ झाड पडत असताना त्या येणाऱ्या तीन महिला बचावल्या. या महिला हॉस्पिटलमधून येत होत्या. या अपघाताबाबत नगररोड वरील उद्यान निरीक्षकांना माहिती कळविली असता बघू ते नंतर, आता मला वेळ नाही, असे त्यांनी सांगितले. अडचणीच्या काळात शासकीय अधिकारी सहकार्य करीत नसतील तर अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांनी कोणाला संपर्क करायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासकीय विभागातील अधिकारी, असे उदासीन वागत असतील तर वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. अपघातस्थळी अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन पाहणी तसेच पंचनामा करणे गरजेचे असताना नंतर बधू, मी ठेकेदाराला पाठवतो, काय असेल तो बघेन, अशी उत्तरे देत जबाबदारी झटकली जात आहे. दरम्यान, खराडी भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे जीर्ण झालेले झाड सकाळी पडले, अशी अनेक जीर्ण झाडे परिसरात आहेत. अनेक झडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत, त्या पडू शकतात, त्यांची छाटणी होणे गरजेचे आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
असा प्रकार झालेला नाही. उलट आम्ही घटनास्थळी लोक तातडीने पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारीही घटनास्थळी तातडीने गेले होते. झाड काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.
– रवी दिनकर साळुंके, उद्यान निरीक्षक