अगदी पूर्वी जेव्हा तंत्रज्ञान सुधारले नव्हते तेव्हा नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी पाण्यातून चालत जावं लागे किंवा पाणी जास्त असेल तर चक्क पोहत जावं लागे. पण माणूस काही स्वस्थ बसणारा नाही. त्याने काटक्याकुटक्या गोळा करून आपल्या क्षमतेनुसार साधा पूल बांधला. त्याला ‘साकव’ म्हणतात. यामुळे पावसाळ्यातही माणसाचे व्यवहार थांबून राहिले नाहीत.
काळ बदलला. नवीन तंत्रज्ञानाशी आपली ओळख झाली आणि हे पूल टिकाऊ आणि बाराही महिने वापरात येतील असे बनले. हेतू एकच की दोन्ही भागातील लोकांना परस्परांशी संपर्क करता यावा. दोन्ही बाजूला असलेल्या सोयींचा एकमेकांना लाभ घेता यावा.
मग माणसाची महत्त्वाकांक्षा वाढली आणि प्रवासाची सोयही व्हावी असे वाटू लागले. नवे प्रदेश धुंडाळावेत आणि त्याचा आनंद घ्यावा यासाठी रेल्वे प्रवासासाठी उंच उंच पूल बांधले गेले, आजही बांधले जातात, जे बघून अंगावर रोमांच उभे रहातात. प्रवास करताना तर मन हरखून जातं. पण यात एक मात्र राहीलं की परस्परांशी संपर्क व्हावा यासाठी पूल बांधले; पण आज आपल्याला “संवादसेतू’ बांधण्याची गरज निर्माण झाली ती फक्त आपल्या वागण्यामुळे. आपण याद्वारे नवे प्रदेश पादाक्रांत करत गेलो. पण आपल्या आसपासचं काय?
शास्त्रात म्हटलं आहे की, सकारात्मक असो वा नकारात्मक पण संवाद असला पाहिजे. यातून परस्परांच्या अस्तित्वाची दखल घेतली जाते. मनात आठवण आहे हे जाणवून दिलं जातं, मनाला एक अदृश्य आधार असतो ज्यामुळे काही करताना आपोआप हिंमत येते. ‘शब्द केवळ बापुडे’ म्हटलं तरी त्यात खूप ताकद असते. यासाठी संवाद सेतू असावेत. मन मोकळे करण्यासाठी तर याची गरज आहे.
पूर्वी औपचारिक वधू वर सूचक मंडळ नव्हती तर परस्पर ओळखीतून स्थळं सांगितली जायची. संवाद हे सेतू मानसिक आजारावर औषध आहे, असं म्हटलं तरी चालेल. हे संवादसेतू परत बांधू आणि थोडे लवचिक ठेवू. अधिक जवळ येऊ. मालिकांमध्ये पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात असाव्यात असे वाटते. पण सुरुवात कुणीतरी करायला हवी. कारण मीच का, असा विचार न करता कुणीतरी पहिल्यांदा साकव बांधलाच ना!
– डॉ. नीलम ताटके