पणती-दिवा… तिमिरातून प्रकाशाकडे, तेजाकडे नेणारा… दिव्याची ज्योत स्वतः जळत राहते आणि इतरांना प्रकाश देते. कधी फडफडते, कधी स्थिर रहाते पण अखंड तेवत रहाते आणि सभोवतालचा परिसर प्रकाशमान करत रहाते. इवलासाच प्रकाश पण अंधार भेदण्याचे सामर्थ्य बाळगून असतो. प्रकाशणे हा त्याचा धर्म!
तू स्वयंदीप हो, अक्षदीप हो…
म्हणजे माणसाने स्वतःच दीपाप्रमाणे तेजस्वी व्हावे, प्रकाशमान व्हावे व स्वतः तेजस्वी मार्गाने जाताना अक्षय प्रकाश देत रहावे.
अगदी लहानपणापासून हा दिवा माणसाची सोबत करत असतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिव्याची भूमिका बदलत रहाते.
जन्मतः नेत्रांचे दिवे लाभतात पण त्यात दृष्टी ज्योत नसेल तर पूर्ण जीवनात अंधार पसरतो.
तान्हुले बाळ घरी प्रवेशताना औक्षण करतात ती असतात निरांजने! मग बारशाला, जन्मदिवसाला निरंजनाच्या ज्योती जीवन तेजस्वी होण्यासाठी, प्रकाशमान होण्यासाठी तेवत ठेवतात. बहीण भावाच्या प्रेमळ सणाला रक्षाबंधन करून बहीण औक्षण करून आयुष्य आणि आरोग्याची प्रार्थना करते.
लग्नानंतर संसार दिसागणी वाढावा आणि सुखाचा व्हावा म्हणून नवरा नवरीचे औक्षण करतात. पाडव्याला, वटपौर्णिमेला पत्नी निरंजनाच्या ज्योतीसोबत प्रेमळ नजरेने पतीचे औक्षण करते त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी!
आकाशातले चंद्र-सूर्य हे दोन्ही तेजस्वी दिवे आणि लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्यारुपी पणत्या माणसास आयुष्यभर सोबत करतात दिवसा अन् रात्री प्रकाशाची वाट दाखवत रहातात.
मग आयुष्याच्या संध्याकाळी होते साजरी एकषष्ठी, पंचाहत्तरी दिव्याच्या साथीने!
आणि इहलोक सोडून जाताना पण शेवटचे औक्षण होते मृत्यूच्या वाटेवर प्रकाश दाखवण्यासाठी! मृत्यूनंतरही दिवा तेवत राहातो. आत्मा तेजात विलीन होण्यासाठी आणि आत्म्यास शांती लाभण्यासाठी!
दिवा तोच असतो पण जीवनाच्या वाटेवर तो संदर्भ बदलत नेहमीच आपली सोबत करत राहतो… प्रकाशाची वाट दाखवत राहातो…
– सुचित्रा पवार