फुलांचे फुलणे दरवळ प्रसवते आणि शब्दांचे फुलणे भावना हे फुलणेच महत्त्वाचे. मग ते फुलाचे असो, शब्दाचे असो की नात्याचे! हे फुलणे म्हणजे त्यांच्या दरवळांच्या हुंकारांचे शकुनच जणू. आपल्या बालभावातून तारुण्याकडे सुरू झालेल्या प्रवासात आपल्या सोबतच आपल्या आजूबाजूचा आसमंत सुगंधीत करत जाणारे जाणिवांचे, भावनांचे, माया, मोह, प्रीती, भीती, हट्ट, विरह, वियोग यांचे हुंकार आणि त्यांचे शकुन-दरवळ..
सृष्टीच्या उत्पत्तीच्याही आधी अनादी अशा ध्वनीची उत्पत्ती झाली आणि ध्वनीतून हुंकार… हा हुंकार म्हणजे ‘कोहं’ च्या शोधयात्रेची सुरुवात. माउलींनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ज्या आदिबीज ओंकाराला नमन केलेय… ‘ओम नमोजी आद्या’ असे म्हणलेय तेच आदिबीज म्हणजे ओंकार, तो अनाहत ध्वनी जो सृष्टीच्या अंतरंगातून हुंकाराच्या रूपात जन्मला… बिजाला जसे रुजून येण्यासाठी जमिनीच्या कुशीत लपावे लागते. फत्तर फोडून स्वबळावर अंकुरावे लागते तशीच हुंकारातून शब्दाची जीवनगाथा सुरू झाली असेल. कधीकधी विचार येतो माणसाला हा हुंकारच गवसला नसता तर? शब्दांचा जन्म कसा झाला असता? म्हणूनच माउलींनी या हुंकाराला ‘स्वसंवेद्य’ अशी उपमा दिली आहे. स्वसंवेद्य म्हणजे ज्याला स्वतःमधील स्वपणाची जाणीव आहे असा.
हे सारं काही लिहिताना हा स्वसंवेद्य आदिबीज हुंकार सतत माझ्या सोबत असतो. या आदितत्त्वाला सोबत घेऊन चालताना; मातीत अंकुरणाऱ्या इवल्याशा बिजाने डोळे उघडताच त्याला आकाशाचे भव्य निळेपण नजरेस पडावे आणि त्या निळाईला मोहून, त्या निळाईत विरघळण्यासाठी त्या रोपट्याने शब्दलकेरी माळत आकाशाकडे झेप घ्यावी तशीच काहीशी माझीही अवस्था होते. या शब्दांच्या दरवळांनी केलेले गारूड वागवताना मनस्वी मोहोरणे म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव मी अनेकदा लिहिताना घेतला आहे.
“आपणच आपल्याला लिहिलेली पत्रे वाचताना; ओले होणारे डोळे पुसत फडफडू द्यावीत वाऱ्यावर पानं’ या आणि अशा मानसिकतेत सोबत असणारी संध्याकाळ मला सोबत करते.
मनाचे जसे आणि जितके मुड स्विंग्ज उमटत राहतात. तशी आणि तितकीच मीही सोबत असणाऱ्या मंद दरवळात न्हात राहते. या दरवळांना शब्दांचे रुप देताना कदाचित मीही दरवळ होऊन वाहत राहते. रोज नवी संध्याकाळ आणि रोज नव्या कॉफीसोबतची रोजची नवी मी, दरवळत राहतो मनभरून! दिवस मावळत असताना ऊन्हाच्या सांजसोवळ्या गूढ स्पर्शाची, त्याला पांघरणाऱ्या धुक्याच्या दुलईची, पाखरांच्या कोटरात ऊब देणाऱ्या पंखांची जाणीव होत जाते. त्याचवेळी प्रेमाची अनुभूती, त्यातील हुरहूर, आभास, त्याचे घट्ट विणीचे स्पर्श. असं सारंकाही माळून ती प्रणयअधिरा मृण्मयी संध्याकाळ आणि क्षितिजावर तिची प्रतिक्षा करणारा तिचा प्रिय सखा चंद्र हातात हात गुंफून आकाशाच्या पटावर सारीपाट खेळायला सुरुवात करतात. मी मात्र हरवलेली असते.अचानक खिडकीबाहेर लक्ष जातं अन् मनात विचार येतो, कदाचित त्या उशिरा आलेल्या खट्याळ चंद्राला ती संध्याकाळ म्हणत असेल,
इश्क़ वाज़िब था हम पर
जो हमने कर डाला
वफ़ा फ़र्ज है तुमपर
देखें..क्या करते हो।
मनाच्या आवर्तात भरकटताना मला तुझी हाक येते. कधी दूरातून तर कधी आतल्याच पोकळीतून आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण हा तुझ्यासोबत तेजाळण्याचा असतो. इथे तू, मी असे वर्गीकरण न होता उरते फक्त तेजाची वलयआभा!
ही संध्याकाळ असो वा उन्हामागे धावणारी सावली किंवा गुलमोहराच्या पाकळ्यांमध्ये दडलेली लालस प्रीती. सारंकाही या कॉफीच्या दर्वळांमध्ये मला सापडत जाते. होकारानंतर ‘ती’ पहिल्यांदाच भेटतेय. अजून तिचा अंदाज आला नाहीये. त्यातच तिला उशीर होतोय यायला. तिला डोळे भरून बघायच्या आधीच डोळे भरून आलेले.तेवढ्यात ती येते. तिच्यासोबत एका कपात कॉफी शेअर करायची असते, त्याचवेळी कपाला लागलेल्या तिच्या लिपस्टिकची टेस्ट कशी असेल? हा विचार येऊन जसं रोमांचित व्हायला होतं ना! आणि आपली ही उडालेली तारांबळ तिला ‘व्यवस्थित’ कळल्यानंतर ती जशी हल्की हसते ना! तसेच आहेत हे कॉफीचे दर्वळ मनाला रोमांचित करणारे! अवचित आलेल्या पावसामुळे पिसारे भिजलेले असतानाही उन्हाच्या कवडशांनी सावलीला सोबत घेऊन पावसात भिजावं आणि नंतर उमललेले इंद्रधनुष्य माळून घ्यावे. त्याच ओढीने मीही रंगत जाते या संध्याकाळ आणि कॉफीच्या कॅंलिडोस्कोपमधे. नव्या जाणिवा, नवे रोमांच हुरहूर सारंकाही मांडत जाते कॉफीच्या सोबतीने.
हातातला प्राजक्त सुकल्यानंतर मन नाराज झाले असताना कोणीतरी अचानक येऊन आपली ओंजळ, अबोध अशा चाफ्याने भरून टाकावी आणि कानात कुजबुजावे. मला प्राजक्त नाही चाफा आवडतो अशावेळी जी सुखाची श्रावणसर मनात झिरमिरते ती सर आणि तिच्या सोबतीने येणारा नाचरा वसंत. फुलपाखराच्या अलवार सावरी पंखांना लेऊन येणारे हे तितकेच अलवार क्षण म्हणजे कॉफीचे दरवळ.
माझ्यासाठी हे कॉफीचे “दरवळ’ म्हणजे तिच्या आणि त्याच्या अलवार क्षणांची कहाणी असते. तशीच ती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचीच कहाणी ठरावी. किती आणि कशा कोणकोणत्या वळणावर क्षणभर थबकल्यानंतर कोणीतरी भेटते, सोबती होते, जीवाचा जीवलग होते. प्राजक्त, चाफा, कॅनव्हास आणि कविता यांच्या सोबतीने सुरू झालेला हा प्रवास चालूच राहतो. अनेक सुखदुःखाचे ऊनपाऊस येतात, सावल्यांचे खेळ रंगतात, पानगळीची झरणी टोचत राहते आणि नदीकाठची कातर विरहिणी, संध्याकाळ बनून मनात दाटते.
या साऱ्यांच्या साक्षीने सुरू राहिलेला हा दर्वळांचा प्रवास मोहोरत राहतो.
तो सतत सोबत राहतो क्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर. तेव्हाही, आताही, आजही. जिथे हुंकारापासून सुरू झालेली ही शब्दजाणीव काना, मात्रा, उकार, वेलांट्या, अनुस्वारांची लेणी लेऊन; वेगवेगळ्या भावनांच्या तुषारांनी चिंब भिजून, वेगवेगळ्या शब्दगंधात दरवळत राहतात. त्या ठिकाणी भेटलेल्या साऱ्या जाणिवांची मी सदैव ऋणी आहे. या भेटलेल्या जाणिवाच माझ्या शब्दांना, माझ्या जगण्याला बळ देतात, मला व्यक्त होण्यास मदत करतात.
जिथे या जाणिवा, विचारांमध्ये आणि विचार शब्दांमध्ये चितारले गेले… ती संध्याकाळ आणि कॉफीची सोबत आकाशाच्या त्या निळ्याशा कॅनव्हासच्या संगतीने सदैव बहरत राहो, हीच माझी अपेक्षा आहे.
– मानसी चिटणीस