गावाकडचं आमचं घर ऐसपैस! वाडाच म्हणा ना! आधी पायऱ्या चढून ऐसपैस ओसरी. मग आभाळाचा तुकडा अंगावर घेणारा उघडा चौक! त्याच्यापुढे हवेशीर सोपा! त्याच्यापुढे किंचित अंधारं माजघर! मग मोकळं ढाकळं स्वयंपाकघर. स्वयंपाकघराच्या एका बाजूला, दिवसाचे चोवीस तास समईच्या मंद प्रकाशात तेवून निघणारं देवघर आणि सगळ्यात शेवटी काळाशार अंधार पांघरून निवांत पहुडलेली पडवी! पडवीच्याही मागे परसदारी नहाणीघर! त्या वाड्याचं मांगल्य जिच्या सात्विक वृत्तीने झळाळून उठे, ती म्हणजे आमची आणि साऱ्या गावाची इन्नी!
इन्नीचा वावर शक्यतो मागच्या तीन खोल्यांत… देवघर, स्वयंपाकघर आणि पडवी. अगदीच चुकूनमाकून माजघर! घरोघरी सुख-दु:ख असतं. राग-लोभ असतात. वाद-प्रतिवाद असतात. प्रत्युत्तरे-दुरुत्तरे असतात. आमच्याही घरी होते… अजूनही असतात! निसर्गनियमाप्रमाणं चालत राहतील! पण इन्नी यापैकी कशातच रमत नसे. स्वयंपाकघरात मुलाबाळांसाठी रांधण्या-करण्यात, घरचा राबता ओढण्यात आणि पूजा-व्रतवैकल्यं-पुरश्चरणांमध्ये गुरफटलेल्या तिला इतर कुठल्याच गोष्टींसाठी वेळ नसे. अर्थात त्याचा तिला सोसही नव्हता म्हणा.
गावाकडे अशा सात्विक बाईच्या हातच्या विरजणाला खूप किंमत असते. इन्नीच्या हातचं विरजण मागायला लेकीसुना, म्हाताऱ्याकोताऱ्या कुठून कुठून आमच्या घराची वाट झिजवत यायच्या. ओसरीवर पुरुष माणसं, म्हाताऱ्या गड्यांचा जथ्था पडलेला असे. गप्पांचा फड लागलेला असे. विरजण मागायला येणाऱ्या बाईला या गराड्यातून आत यावं लागे. अशी एखादी बाई आत जाताना दिसली की पुरुष माणसं भराभर उठून बाजूला होत आणि त्या बाईला आत जायला जागा करून देत. ओसरी, चौक, सोपा ओलांडून किंचित अंधाऱ्या माजघरात शिरलेली ती माऊली दणदणीत आवाजात इन्नीला हाक घाली. ईन्नी… मुरवाण देत्यासा का वाईच!
ईन्नी बऱ्याचदा देवघरात पूजाअर्चा करत असे किंवा सोवळ्यात रांधशिजव करत असे. बाहेरची हाक ऐकून तिचा स्रोत्रं पुटपुटण्याचा आवाज किंचित मोठा होई. बाहेरची ती माऊली समजून जाई की इन्नी पूजा करत आहे. पाच मिनिटं थांबावं लागेल. दिवसभर कामाच्या आणि देवाधर्माच्या रगाड्यात बुडालेली इन्नी विरजण मागायला येणाऱ्या बाईला हसतहसत सामोरी जाई. हातातलं काम आवरून हसतमुखाने इन्नी बाहेर येई तेव्हा पूजेच्या प्रसन्नतेनं तिचा चेहरा तेजाळलेला असे.
इन्नी बाहेर आली की ती माऊली पदराखाली झाकलेलं ते विरजणाचं भांडं हळूच बाहेर काढून इन्नीकडे सुपूर्त करी. त्या भांड्यासोबत कधीतरी नवरात्रीच्या कडाकण्या, कधी संक्रांतीचे घारगे, कधी परसदारातल्या पावट्याच्या-तुरीच्या पसाभर शेंगा कधीकधी तर देवाच्या पूजेसाठी लालभडक जास्वंदीची किंवा चाफ्याची फुलेही असत. देणंघेणं हा मुद्दाच नव्हता अर्थात! होती ती केवळ एकमेकांसाठी निरपेक्ष कृतज्ञता! आपण आणलेला ऐवज इन्नीकडे देऊन ती माऊली माजघराचा कोपरा बघून आटोपशीर बसकण मारे. इन्नीच्या चेहऱ्यावर ओथंबलेली माया बघून कोपऱ्यात विसावलेली ती माय दुरूनच तिचा अलाबला घेई. नजरेतूनच सुखदुःखाची देवाणघेवाण होई.
इन्नी, कारभारी खाटंवरच हाय ओ! आता काई त्याला रेटायचं न्हाई बघा! सगळी दवादारू केली-देवदेव करून झालं… काही उपेग नाही! वरीसभर सगळ्या उसाभरी केल्या. गुण येईना बघा! कुंकवाच्या धन्याचं हाल बघवत न्हाई इन्नी! काय करू वो? दबक्या पावलांनी आत शिरलेली ती माऊली इन्नीसमोर मनमोकळं रडून घेई. तिचा दबलेला हुंदका बाहेर पडून मोकळा झाला की इन्नी तिला चार धीराच्या गोष्टी सांगे. हातावर चार खडीसाखरेच्या दाण्यांचा प्रसाद ठेवी. घोटभर गुळाचा चहा पुढे करे. तोपर्यंत दह्याच्या लोटीतलं चमच्याने ओढलेलं एक कवडी दही त्या बाईच्या विरजणाच्या भांड्यात दिलेलं असे. त्या दह्यावर पूजेच्या फुलांमधलं एक तुळशीचं पान टाकून इन्नी ते भांडं तिला परत करे. इन्नी, तुझ्या आंबाबाईपतूर माझा निरोप धाड गं बाई! माझ्या धन्याला सोडव म्हनावं! म्हणत ती बाई हात जोडे आणि येताना जशी हळूहळू येई तशीच हळूहळू चालू लागे.
इन्नी होती तोपर्यंत सोयर-सुतकानंतर शिंपडायला गोमूत्र मागायलाही कित्येक जणी येत. एकतर तेव्हा दहीताक विकत मिळत नसे. घरच्या लक्ष्मीलाच मेहनतीने दूधदुभतं सांभाळावं लागे. त्यामुळे विरजण मागण्यात लाज वगैरे वाटण्याचा मुद्दाच नव्हता. त्याहीपेक्षा माणसानं माणसाला भेटण्यासाठी विरजण, वाटीभर साखरेचं किंवा दोन कांद्यांचं उसनंपासनं निमित्त पुरत असे. माणसं एकमेकांच्या सान्निध्यात येत. भेटत-बोलत-मोकळी होत. त्यामुळे त्यांच्यातल्या नात्यांचे बंध आणखी घट्ट होत असत. निमित्त काहीही असो. लेकीबाळी तिला त्या निमित्ताने घरी येऊन भेटत असत. ती शक्यतो बाहेर जात नसे. पण अशाच एखाद्या बाईकडून कोणाच्या तब्येतीची बातमी कळाली की मग मात्र इन्नी सवड काढून त्या आजारी माणसाला भेटून येई. पूजाअर्चा आटोपून, पोराबाळांना खायला घालून झालं की मग ती कपभर साखरेचा चहा करे. तो गरम चहा किटलीत घेऊन भर दुपारी आजारी माणसाला भेटायला गेलेली इन्नी मला जशीच्या तशी आठवतेय! आजही! थरथरती पावलं टाकत हळूहळू चालणाऱ्या इन्नीच्या मागे आम्हीही जात असू. कित्येक म्हातारीकोतारी माणसं इन्नीच्या हातचा शेवटचा चहा पिण्यासाठीच जीव साठवत होती कदाचित. तिच्यासमोर किंबहुना तिच्यातल्या सात्विकतेला हात जोडून शेवटचा श्वास घेणारेही कित्येकजण असावेत.
इन्नी अतिशय सामान्य गृहिणी होती. कदाचित कर्मठ चालीरीतींमध्ये अडकल्यामुळे तितकीच देवभोळी आणि भित्री-बुजरी! पण तिच्यातली सात्विकता मात्र तिने आयुष्याच्या अंतापर्यंत सांभाळून-जपून ठेवली.म्हणूनच ती गेल्यानंतरही त्या वाड्याला, त्या गावाला तिच्या आठवणींत रमायला आवडतं! माणसं अजूनही हळवी होतात! कित्येकांचे डोळे अलगद ओले होतात. आताशी गावाकडेही कोणी कोणाकडे विरजण मागायला जात नाही. पण “विरजण’ या शब्दाशी इन्नी मात्र तशीच बांधली गेलेली आहे. आणि ते “विरजण’ माणसांच्या माणसांशी असलेल्या लाग्याबांध्यांचं घट्ट दही जमवण्यासाठीच असावं बहुधा!
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी