भुवनेश्वर – ओडिशातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी खर्चाने मोबाइल फोन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधणे सोपे व्हावे, तसेच त्यांच्यातील समन्वय आणि कामाचे निर्देश देण्याचे काम अधिक कार्यक्षमपणे व्हावे यासाठी त्यांना मोबाइल फोन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तुकुनी साहू यांनी दिली.
प्रत्येक अंगणवाड्यांना वजनकाटाही दिला जाणार आहे. तेथे शिकणाऱ्या मुलांचे वजन दैनंदिन स्वरूपात नोंद ठेवण्यासाठी ही सोयही तेथे करण्यात आली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार कमी करून त्यांना अधिक समान संधी मिळावी यासाठीही अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी संपर्क पॅकेजला महत्व दिले जात असून संयुक्तराष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडामार्फत निधीची उभारणी केली जात आहे.