भुवनेश्वर – कॉंग्रेस आणि डाव्यांसह 12 राजकीय पक्षांच्या ओडिशा शाखांनी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत तपास व्हावा. नि:पक्षपाती तपासासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्या पक्षांनी केली आहे.
तिहेरी रेल्वे अपघात ओडिशात झाला. त्यामुळे त्या राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपची कोंडी करण्यासाठी ओडिशातील बहुतांश विरोधी पक्ष पुढे सरसावले आहेत. त्यामध्ये सप, राजद, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आप, समता क्रांती दल आदींचाही समावेश आहे.
भीषण अपघातासाठी रेल्वे मंत्रालयाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप करत त्या पक्षांनी रेल्वे मंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. मात्र, ओडिशातील सत्तारूढ बिजदने सीबीआय तपासाचे स्वागत केले आहे.
सीबीआय तपासामुळे खरे गुन्हेगार जाळ्यात येण्याची आशा त्या पक्षाने व्यक्त केली आहे. तर, रेल्वे अपघाताचा तपास करण्यासाठी सीबीआय ही सर्वोत्तम यंत्रणा असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.