पुणे – राज्यातील बहुतांश भागातून मान्सूनने परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. या भागांमधील तापमानाचा पारा वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत शहरातील कमाल तापमान 31.7, तर किमान तापमान 18.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
राज्यात सर्वदूर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र, कोकणात अजूनही काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या भागातही उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान मंगळवारी (दि.27) राज्यात नाशिक येथे 16.3 अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली, तर जळगाव येथे सर्वाधिक म्हणजेच 35.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात चढउतार होणार असून त्यानंतर हळूहळू गारठ्यात वाढ होण्यास सुरूवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.