- शर्मिला जगताप
सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाची वार्ता 21 मे रोजी कानावर आली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या महान व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्ष भेटता आले नाही. मात्र, ते पहिल्यांदा भेटले पाठ्यपुस्तकातून.
“चिपको’ असे गमतीदार नावाची त्यांची चळवळ पाठ्यपुस्तकातून वाचण्यात आली. “चिपको’ या नावाचा आशय खूपच खोलवर असल्याचे पुढे समजले. “चिपको चळवळ’ म्हणजे लोकांना झाडे तोडण्यास मनाई करावी.
झाडे तोडली जात असताना प्रसंगी झाडांना मिठी मारावी आणि झाड तोडण्यास मनाई करावी, असा साधारण आशय असलेली ही चळवळ.
आम्ही शाळकरी मुलींनी प्रत्यक्ष कृतीत आणलेली पहिली चळवळ म्हणजे झाड वाचविणे आणि नवी रोपटे लावणे. प्राथमिक शाळेत आणि उच्च माध्यमिक शाळेत लावलेले रोपटे आज महाकाय वृक्षांमध्ये बहरलेले पाहताना सुंदरलाल यांचीच आठवण येते.
पर्यावरण वाचवण्याच्या उद्दिष्टाने झपाटलेल्या या “कल्पवृक्षा’ने नावाप्रमाणे ही पृथ्वी “सुंदर’ करण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला.
सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म उत्तराखंडच्या पहाडी प्रदेशातल्या टिहरी जवळच्या गावातील. हिमालयात असलेली जंगले, झाडे यांचे रक्षण करायला हवे याची प्रखर जाणीव त्यांना झाली. उत्तर प्रदेशातील झाडे, जंगले नष्ट करणाऱ्या जंगलाच्या ठेकेदारांविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले.
तेच चिपको आंदोलन. पर्यावरण विषयक चळवळ हिमालयात आणि नंतर संपूर्ण भारत देशात आणि त्याही पलीकडे पसरली.
चिपको आंदोलनात स्त्रिया एकत्र येऊन साखळी तयार करत आणि खरोखरच झाडाला मिठी मारून ते झाड तोडण्यापासून वाचवत होत्या. अगोदर आम्हाला कापा मगच झाडाला कापा. हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
हेच ब्रीदवाक्य शाळेपासून कानावर पडत गेले. आपल्या जगण्यापेक्षाही झाडे-झुडपे जगणे, पर्यावरण जगणे जास्त महत्त्वाचे वाटले.
या “कल्पवृक्षा’च्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी “चिपको’ आणि “वृक्षारोपण’ करत राहिल्यास एक दिवस ही पृथ्वी हिरवागार शालू नेसून “सुंदर’ होईल.