पळसदेव -इंदापूर तालुक्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 63 हजार एकर क्षेत्राला उजनी धरणाच्या मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पाच टीएमसी पाणी आणले. त्यामुळे इंदापूर तालुका आणखी समृद्ध होण्यासाठी मदत होणार आहे. मात्र, याबरोबरच ज्या धरणग्रस्तांनाही आपल्या जमिनी उजनी धरणासाठी दिल्या. त्याच धरणग्रस्तांना आज हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. ही इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी राजकीय शोकांतिका बनली आहे.
उन्हाळ्यात धरणग्रस्तांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. उजनी धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत तेवढेच पाणी राखीव आहे. मात्र सध्या उजनी काठावरील पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील काठावरील गावातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आले आहे. त्यामुळे या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे.
मात्र, मागणी वाढली तरी मूळ आराखड्यात पाण्याची तरतूद आजही कायमच आहे. उजनी काठावरील नागरिकांना सध्या केवळ आठमाही पाणी परवानगी दिली जाते. त्यामुळे धरणग्रतांसाठी वाढीव पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी उजनी काठावरील शेतकरी व धरणग्रस्त करीत आहे. याशिवाय धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपली घर, जमिनी दिल्या. त्यांना अगोदर प्राधान्य देणे आवश्यक आहे.
दरवर्षी कालवा सल्लागारांच्या बैठकीत पाण्याचे नियोजन करण्यात येते. जास्तीत जास्त झुकते माप ज्या भागातील नेत्यांचे वजन अधिक त्या भागाला पाणी अधिक, असा दळभद्री कारभार सध्या सुरु आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी अवहेलना, फरफट येत आहे. यात इंदापूर आणि सोलापूरच्या राजकीय नेत्यांनी सहमतीने यातून तोडगा काढण्याची गरज आहे. मात्र, राजकीय इच्छाक्तीला तिलांजली दिली आहे.
मंत्री भरणे यांनी मतदारसंघासाठी पाच टीएमसी पाणी आणून मोठा निर्णय घेतला आहे. याचे पडसाद आणखी बरेच महिने त्यांना उमटणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावरून आगडोंब उसळला आहे. अनेक नेते मंडळी या निर्णयाला विरोध करीत आहेत. मात्र, त्यांचा हा विरोध केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे.
मंत्री भरणे यांनी आणखी एक क्रांतिकारक पाऊल टाकून उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी हक्काचे पाणी राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी तालुक्यातील उजनी काठावरील शेतकऱ्यांची मागणी आहे. दरवर्षी उजनी काठावरील शेतकऱ्यांचे उन्हाळ्यात दयनीय अवस्था होते. याकडे देखील मंत्री भरणे यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे; अन्यथा शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी स्वतःच न्यायालयीन लढाई लढण्याची वेळ येणार आहे.
उजनीतील पाण्याची तरतूद आकडेवारीत
सध्या उजनी धरणातून पाण्याची तरतूद टीएमसीमध्ये आहे. भीमा उजनी प्रकल्प प्रवाही क्षेत्र 34. 51, खासगी उपसा क्षेत्र 7.63, सीना माढा उपसा सिंचन योजना 4.75, भीमा सीना जोड कालवा 3.15, दहिगाव उपसा सिंचन योजना 1.81, शिरपूर उपसा सिंचन योजना 1.73,आष्टी उपसा सिंचन योजना 1.00, बार्शी उपसा सिंचन योजना 2.59, एकरूख उपसा सिंचन योजना 3.16, सांगोला उपसा सिंचन योजना 2.00, लाकडी निबोडी उपसा सिंचन योजना 0.57, मंगळवेढा उपसा सिंचन योजना 1.01, धरणातील बाष्पीभवन 14.68 (सर्वाधिक बाष्पीभवन 2008-2009), पिण्यासाठी पाणी वापर 2.49, औद्योगिक वापर 3.26, या प्रमाणात पाणीवाटप आहे. आणखी अनेक पाणी योजना धरणावर स्थापित आहेत. त्या अद्याप कार्यान्वित झाल्या नाहीत.